Wednesday 16 October 2019

मी, आपण आणि सिस्टीम..!



               #मी, आपण आणि सिस्टीम
             तीच आशा ,तोच प्रवास तेच चेहेरे,अन तीच निराशा. एखाद्या पत्ता माहीत नसलेल्या पाचटाने वाऱ्यासोबत सैरपणे वाहनं. कुठं जायचं, कस जायचं माहीत नाही. तरीही कोळ्याच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या किड्या सारखं सुटण्याच्या आशेने, अजून गुंतत जायच.
        'Struggle' चा खरा अर्थ त्याच्या नावात नसून त्याला जगण्यात आहे,हे खरंच म्हणावं लागेल. सगळं काही आहे, पण 'काहीच नसल्यासारखी' भावना मनात उगिच भीतीचे डोंगर निर्माण करते. अन थकलेल्या वाटसरू सारखी त्याची तृष्णा त्याला कोरडं बनवत जाते,मग पाहिलेल्या स्वप्नाचा एक एक धागा असा काही तूटत जातो की, मेंदूच्या चेता तंतूंनी आपलं कामच विसरुन जावं. अन मागे उरावा फक्त भग्न स्वप्नांचा सांगाडा! या चेताहीन सांगाड्याने कधी खऱ्या स्वप्नांची अपेक्षा पूर्ण केली आहे का?
        हा  काळ खरंच किती आत्मक्लेशाचा असतो ,हे ज्यांनी अनुभवलं नाही त्यांना तो कधीच कळणार नाही. रोजची तीच वाट ज्यावेळी ओळखीची होते परंतु आपल्या स्टेशनचा पत्ताच मात्र लागत नाही, त्याला ती किती असह्य वाटत असेल ! रोजचं  वयाचं वाढणारं गाठोडं घेऊन मग मृगजळाच्या पाठीमागे धावायचं. त्याच त्वेषाने! पण हा त्वेष आणायचा तरी कुठून रोज रोज! जसा जसा रस्ता दूर जातो तशी संपत चाललेली आत्मविश्वाची शिदोरी आणायची तरी कुठून!
      ही परिस्थिती आहे त्या तरुणाची! ज्याकडे सगळं काही आहे फक्त नाही ती संधी! येणाऱ्या दिवसाला नशिब नावाच्या घट्ट दोरीने बांधून  कटु प्रसंगाला अन ठेचांना किती दिवस लपवायचं!
     हो, मी अनुभवलं ,मी पण ! अशी म्हणणारी कितीतरी विशी-तिशी मधली मंडळी रोज कोणत्या तरी सरकारी ऑफिसात, कंपनीच्या दारात उभे राहताना दिसतात.अगदी त्या फुटबॉल सारखं...जिंकण्याच्या शर्यतीत आपण लाथाडले जातोय, हे विसरत....
    कशासाठी असतो हा अट्टाहास??
'नोकरी' ती सरकारी असो वा कंत्राटी, ती भेटली म्हणजे तुम्ही एक नागरिक (सुजाण म्हणता येईल) म्हणून ओळखले जातात, ४ लोकांत आजवर वर न काढलेली छाती तुमहाला दिमाखात वर काढता येन अन आयुष्यातलं struggle संपलं म्हनून पूर्णविराम देन. यासाठी!!!
       मग दोष कुणाचा? 'सगळं' काही असणाऱ्या तरुणांचा की सिस्टिम नावाच्या अदृश्य  राक्षसाचा? अन या सगळं असणाऱ्या तरुणाला हे कधी कळणार की त्याच्याकडे खूप काही आहे. वाळवीसारखं पोखरणाऱ्या या  सिस्टमच्या किडेने कितीतरी जणांचे स्वप्नं सुद्धा अशीच पोखरली आहेत. मुळात संधी नाकारणं, संधी नसणं अन संधी असूनही नाकारलं जाणं यात फरक करता येत नाही ,केवळ या सिस्टिम मुळे..!!
      अन "आपण" कुठे आहोत? चवताळलेल्या मधमाश्यांसारख तुटून पडतो आपण, एखाद्याच्या स्वप्नाना डंख मारण्यासाठी.
आधारासाठी अन सहानुभूती साठी  धडपडणारी ही मंडळी स्वतःच्याच म्यांनातून होणाऱ्या वारांना कसा प्रतिरोध करणार??
       यातला "मी" म्हणजे आजचा धडपडणारा तरुण....
जोपर्येंत "आऊट ऑफ द बॉक्स" ची ठिणगी आपल्यात पेटत नाय तोपर्येंत आपण आपल्याच लोकांनी रचलेल्या सरणावर जळणार आहोत....
      
-बाळासाहेब गाढवे
मु. पो. ढाकेफळ ता. घनसावंगी
जि. जालना    9960333548

Saturday 29 September 2018

क्षणभंगुर.....

                      क्षणभंगुर.....

थंडगार ऊसाचा रस घेऊन मी अन स्वामीन वेरूळ सोडलं अन पुढच्या वाटेला लागलो. वाकडी वाट करून आम्ही ४ च्या दरम्यान वेरूळला आलो असतोल. कैलाश मंदिराची ती भव्यता अन ते सुंदरे लेणी शिल्प  अवाक करायला लावत होत.परंतु मुघलांच्या आक्रमणामुळे भंग पावलेल्या त्या लेण्या, तिथली हत्तीशिल्पे अजून ही त्या समृद्ध वारशाची साक्ष देत आहेत असं नक्कीच वाटतं.
गेटजवळच्या वडाच्या झाडावर काही माकडे माकडचाळे करत होते अन त्यांचे माकड चाळे पाहनारा  माणूस नावाचा प्राणी (जो की याच प्रजातीचा उच्चकुलीन वंशज होता) त्या बिचाऱ्या माकडांची मजा घेत होता. पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू मात्र होत.
आम्ही आता वैजापूरच्या रस्त्याला लागलो. अजून मावळतीचा सूर्य  हातभर वर होता,त्याचा तो शांत प्रकाश रस्त्यावर सांडला होता. मगवाच्या उसाच्या रसाने पोटात थंडगार झालं होतं,अजून तासाभरात आपण महेशच्या घरी असू, दुपारपासून कावकाव करणार पोट घरच्या जेवणाने कस तृप्त होईल, स्वामीच्या खांद्यावर डोकं ठेवून विचार करत होतो.
आम्ही वेरूळ सोडून  वीसएक मिनिटे झाली असतील, एका वळणावर स्वामीने अचानक ब्रेक लावलं अन गाडी थांबवली,समोर २०-३० माणसे रस्त्यावर उभा होते, दोनचाकी गाड्या थांबत होत्या पण मोठाले वाहन जात होती. समोरची गर्दी पाहून मनात शंकेची पाल केव्हाच चुकचुकली होती. पण कुठेच अपघातासारखं काही दिसत नव्हतं. मी गाडीवरून उतरलो.अन समोरच दृश्य पाहून काळजात धस्स झालं.
एक २४-२५ वर्षाचा तरुण रस्त्याच्या कडेला शांत पडला होता. अंगात मळके कपडे.गळ्यात लाल उपरणं,परंतु तोंड कोणीतरी पांढऱ्या कापडानं झाकलेलं. त्याच्या कपड्यावरून तर तो नक्कीच शहरातला वाटत नव्हता.तो झोपलेला होता. विचारपूस केली तेव्हा लक्षात आलं १० मिनिटापूर्वी अपघात घडला होता. अधारकार्डवरून कळालं की तो जवळच्याच गावातला आहे अन त्याच्या घरचे येत आहेत. मी थोडा जवळ गेलो, रक्त अजून ताज होत, हातापायाची हालचाल होत नव्हती पोट थोडं उघडं पडलेलं होतं, पण पोट खालीवर होत नव्हतं, २-३ मिनिटे मी एकटक त्याच्या पोटाकडे बघत होतो एक आशा होती की आता तरी हालचाल होईल. मध्येच एकजण येऊन म्हणाला,जागेवर गेला राव! बापरे काळजात धसकन झालं, म्हणजे आता तो कधीच उठणार नाही, तो कोणाला बघूही शकणार नाही, त्याच सगळं अस्तित्व मिटणार,त्याचे दोस्त, मुलंबाळं,आईवडील कोणालाच तो आता बोलणार नाही,बघणार नाही. मला ही वस्तुस्थिती सहन होत नव्हती, मी सारखं त्याच्याकडे पाहत होतो,त्याच्या हालचालीची अपेक्षा करत होतो.पण नाही, तो निष्प्राण झाला होता,आतापर्येंत कोणालाही न दिसलेला 'जीव'नावाचा अवयव त्याच्या देहातून निघून गेला होता. पहिल्या वेळेस डोळ्यासमोर मृत्यू पहिला होता, मन सुन्न झालं.
५ मिनिटांनी एक दोनचाकी थांबली. २०-२१ वर्षाची स्त्री उतरली अन त्या व्यक्तीला शोधू लागली,कडेवर १०-१२ महिन्याचं बाळ. पांढऱ्या रुमालाने झाकलेल्या त्या देहाकडे तीन पाहिलं अन ती २ मिनिटं स्तब्ध राहून टकमकपणे त्याकडे पाहत होती,२० मिनिटापूर्वी पलीकडच्या शेतातून येतो म्हटलेला नवरा गपगार पडलेला पाहत ती होती,अजूनही टकमक पणे ती त्याकडे पाहत होती. ती त्याच्या जवळ गेली फिकट लाल चौकड्या शर्टावरून तिने ओळख होतं की तो तिचा मालक होता. तिने फोडलेल्या टाहोने तिथल्या प्रत्येकाचं काळीज चिरत होतं. तिला लोक ओढत होते पण ती त्याला सोडत नव्हती.कडेवरच पोरगं बिथरून ते पण रडायला लागलं अन सगळ्यांचे अश्रू अनावर झाले.
"हिला कोणी आणले  रे , हिला मागे घ्या,आता अँबुलन्स येईल त्याला दवाखान्यात न्यायचं ," एक समजदार व्यक्ती तिला बाजूला करत म्हणत होता.
ती रडत होती फक्त!!
अगं, रडू नकोस तो बेशुद्ध झालाय फक्त आता अँबुलन्स येईल.
"हिला न्यारे  कोणीतरी परत ,कशाला आणलं इकडं"
तिच्या भावाला सांगितल्यावर तो तिला घेऊन जात होता,पण ती आपल्या मालकाकडे पाहत होती पण तो तिच्याकडे पाहत नव्हता ती रडत होती, पब त्याला आवाज येत नव्हता, तो आज अस काय करतोय म्हणून तिला जास्तच रडू येत होतं.
तिच्या कपाळावरची टिकली ही गळून पडली होती, तिच्या त्या अभागी कपाळाकडे पाहून नकळत माझ्या डोळयातून अश्रू आले.
ती नुसती रडत होती, तो फक्त बेशुद्ध झालाय एवढ्याच आशेवर ती होती... पण मुळात तो नव्हता आता. तो संपला होता. आजपासून ती त्याला पोरकी झाली होती, पती नावाचं कुंकू पुसलं गेलं होतं, पांढऱ्या कपाळाने ती जगणार होती....आयुष्यभरासाठी... कडेवरच्या बाळासाठी बाप काय असतो हे समजण्यागोदर तो सोडून गेला होता.. पोटातल्या बाळाचं तर तेवढं ही भाग्य नव्हतं ...क्षणात सगळं संपल होतं... त्याचा सहवास... त्याच बोलणं,  मुळात त्याच असणं.... आता नव्हतं ....आज एक चाक अलगद निखडून गेलं होतं... सगळा भार त्या अभागी कपाळावर सोडून.... कल्पना ही करवत नाही तिचा उद्याचा दिवस काय असेल... त्या मुलांचं काय?  त्या मायबापाच काय? कितीतरी प्रश्न क्षणात डोंगराएवढे झाले होते..
ती स्वतःला सावरू शकत नव्हती, त्या बाळाकडे तीच लक्ष नव्हतं,तिला लोकांनी गाडीवर बसवलं पण ती अंग सोडून देत होती ....तीला त्याला सोडून जाऊ वाटत नव्हतं....तो म्हटला होता मी २० मिनिटात परत येतो म्हणून.......!
कसंबसं तिला बसवलं न जायला सांगितलं....
आम्ही ही तिच्या मागे आमची गाडी घेऊन जात होतो..... भीती वाटत होती ती स्वतःला सावरू शकेल का ? शिवाय छोटं बाळ सोबत..... किमान ६ किलोमीटर आम्ही तिच्या मागे जात होतो .......मगवापासून रडणार बाळ तिच्या कुशीत शांत झाल होत....ते झोपलं असावं .....नाहीतर आपल्या अभागी आईच्या नवऱ्याला जाब विचारत असावं......
एका वळणावर ती वळाली..... अन दुसऱ्या वळणावर तो निष्प्राण झाला होता ....
मनाला पोळवून गेलेला प्रवास आयुष्यभरासाठी हुरहूर सोडून गेला........क्षणभंगुर जीवनाचा!!!😢😢

Monday 16 April 2018

न उमलणाऱ्या कळ्या....

काल ती गेली होती.... आज ही गेली.... अन उद्या दुसरी कोणीतरी जाईल.... काय  अन कितीसा फरक पडतो कोणाला?
व्हाट्सएप स्टेटस, ब्लॉग,डीपी, कँडल मार्च किंवा निषेधाचे मोर्चे घेऊन आपण गल्लोगल्ली फिरू, आम्ही खरंच खूप संवेदनशील आहोंत याचा आव पण आणू! उद्या अजून कोणीतरी कोणाची वासना बनेल ,शिकार बनेल ...मग आम्ही परत मोर्चे काढू, व्हाट्सएप स्टेटस ठेवू, नाही का? आपण किती जागरूक आहोत किंवा आम्ही किती मानवतावादी आहोत हे जगाला ओरडून सांगू... पण???
पण असे केल्याने हे कमी होईल का? एव्हाना आतापर्येंत झालंय का?? मग का करतो आपण ...ज्यातून काहीच भेटत नाही.. काहीच कमी होत नाही...
कोपर्डी झालं.....लाखोंच्या गर्दीने मोर्चे निघाले.... मग काय झालंय .....पुन्हा कोपर्डी झालंच नाही का.... पुन्हा एखादा जीव बळी पडलाच नाही का?? आपण आंधळे बनत चाललो आहोत...
कालच पिंपरी चिंचवडची घटना, स्वतःच्या बापाने मुलीवर बलात्कार केला... आता काय करणार आहोत आपण..... कुठे ठेवणार आहोत आपण  या निरागस पाखरांना, स्वतःच्या घरट्यातच जर वासनेने बटबटलेला साप गिळायला तयार असेल तर बाहेर तर  हजारो साप सावजासाठी डूख धरून बसलेले आहेत......
उद्या यांना फाशीची शिक्षा देऊन हा प्रश्न खरंच मिटणारा आहे का? प्रश्न इथे मानसिकतेचा आहे ....इथला समाज सडत चाललाय ...आधुनिकतेच्या नावावर संस्कृती वरच हजारो वर्षापासून बलात्कार होत आहे अन त्यामूळे इथला माणूस नावाचा प्राणी सुद्धा  वासनाधीन झालाय..संस्कृती कधीच विज्ञानाच्या आड आली नाही परंतु आपल्या आधुनिकतेच्या भुताने संस्कृतीचे लक्तरे मात्र वेशीवर टांगली आहेत. अन याला परंपरावाद्यांनी विरोध केला तर व्यक्तिस्वातंत्र्याच्या अस्त्राने त्यावर नेहमीच हल्ला केलाय ...अन आशा कोंदट वातावरणात जर नवा समाज जन्म घेत असेल तर यापेक्षा दुसरी अपेक्षा काय ती करावी....
नीती मूल्य,तत्वे ही फक्त आता पुस्तकात वाचताना छान वाटतात किंवा स्टेटस मध्ये उठून दिसतात ,पण त्यांची रोज होणारी कुचंबना कोणाच्या लक्षात येत नाही किंवा ती आणायची नाही...
आज एका स्त्रीला एक मादी म्हणूनच पाहिलं जातं ,यात दोष पुरुषाचा की स्त्रीचा की आपण स्वतःच्या मानगुटीवर बसवून घेतलेल्या व्यक्तीस्वातंत्र्याच्या भुताचा. TV सिरिअल्स, किंवा चित्रपटाद्वारे आधुनिकतेच्या नावाखाली  आपल्या संस्कृतीचं जे काही दमन चालवलं आहे न त्याचा तर परिपाक नसावा हा?? पण हा प्रश्न कोणालाच पडत नाही.
माणूस हा अनुकरणशील प्राणी आहे ,जर अनुकरणच सदोष असेल तर निपजणारा समाज कितपत चांगला असेल! याची अपेक्षा न केलेलीच बरी!!
माझा हा मुद्दा बऱ्याच जणांना रुचनारा नसेलही कदाचित ,परंतु  ही वस्तुस्थिती आहे..चांगला समाज अन वाईट समाज बनवलं हे आपल्या हातात असतं..... समाज घडवणारे हातच,..म्हणण्यापेक्षा  तत्वच जर दूषित असतील तर सुसंस्कृत समाज कसा बनेल..! अन जर तो बनत नसेल तर असिफा सारख्या निरागस कळ्याना कोणी वाचवू शकणार नाही....याच दुःख वाटतं..😢

Monday 12 February 2018

ती....... भाग १



....ती एका हातात बॅग अन एका हाताने चेहऱ्यावरचे केस आवरत बस मध्ये चढली. गडद निळ्या रंगाचा टॉप तिच्या गोऱ्या वर्णावर आज जरा जास्तच खुलून दिसत होता. आज ती फ्रेश दिसत होती.. तिच्या गालावर पडणारी खळी वेड लावणारी होती.  बस मध्ये जास्त गर्दी नसल्याने तनुजाला जागा भेटली.कॉलेज सुरू होऊन १५ दिवस झाले होते, रोजची गर्दी नसल्याने तिला थोडं हायसं वाटलं. तरीही८-९ वीचे मुलं मुली जागेसाठी गोंधळ करत होते.तनुजाला पाठीमागून दोन नंबरची  सीट मिळाली. पाठीवरची बॅग सिटवर ठेवून तिने त्यातून एक चॉकलेट काढलं, इकडे तिकडे बघत गपकन तोंडात टाकलं , अन त्या चॉकलेटच टरपल खिडकीतून बाहेर फेकलं.
 पाच एक मिनिटांनी कंडक्टर ने दिलेल्या घंटीच्या  आदेशाने बसने जागा सोडली अन ती पळती झाली. तेवढ्यात गाडीच्या पाठीमागच्या बाजूला कोणतरी जोरात धाप धाप मारत होत. ड्रायव्हरने कचकन ब्रेक दाबलं, अन सगळे जण समोरच्या सिटवर धडकले. अन गाडी थांबली. कंडक्टरने वैतागून दरवाजा उघडला.हातात २ पुस्तकं घेत तो धापा टाकत बसमध्ये चढला, कंडक्टरने खिडकीतून बाहेर परत कोणी आहे का पाहिले अन दोरी ओढली ,दुसऱ्यांदा घंटी वाजली.अन बस धावू लागली.
तो अजून धापा टाकत होता, घामाने त्याचा चेहरा डबडब झाला होता. खिशातल्या रुमालाने तोंड पुसत तो जागा पाहत होता. तो तिच्या शेजारी बसला.अन एक मोठा श्वास घेऊन बस मिळाल्याच्या आनंदात तो सोडला !तनु २ मिनिटे स्तब्ध होती, कारण तिच्या तोंडात चॉकलेट होत, तिला कळत नव्हतं की ते याच्यापुढे खावा की खाऊ नये? ती त्याला बसमध्ये पहिल्यांदा पाहत होती. खिडकीकडे तोंड करून तीनं ते पटपट खाल्ल.छोट्या रुमालाने तोंड पुसून ती समोरच्या सीटकडे पाहत बसली. अधून मधून ती तिरकस पणे त्याच्याकडे पाहत होती.
तो गावात नवीन होता. आज त्याने जांभळ्या रंगाचं शर्ट अन पांढरी पॅन्ट घातलेली होती, नाकाडोळ्यात तो सुंदर होताच पण त्याचा गोरा वर्ण त्याला अधिक रुबाबदार बनवत होता, त्याच्या केसाचा भांग अन त्याचा हसरा चेहरा त्याला अधिकच सौंदर्य प्रदान करत होता. शाम नानाच्या घरी पाहूणा होता .नानाच्या बहिणीचा तो एकुलता एक मुलगा होता. गावाकडे शिक्षणाची सोय नसल्याने तो मामाकडे आला होता. नाना म्हणजे गावातलं चांगलंच प्रतिष्ठित प्रस्थ आहे.२५ एकर निव्वळ काळ्या मातीची बागायती फक्त गावात त्यांनाच आहे.
शाम आता बराच सावरला होता. चिंचखेड्याहून अंबडला जायला पाऊण तास लागतो. अंबडला शाळा,कॉलेज चांगले असल्याने सगळ्या पालकांचा ओढा शिक्षणासाठी अंबड हाच असे. शामने  बाजूला पाहिलं ,तनुकडे तो पाहतच राहिला, त्याला उशिरा आल्याचा आता आनंद  झाला ,त्यामुळे त्याला तिच्या जवळ जागा मिळाली. तनुजा सुंदर तर होतीच पण ती आज जास्तच सुंदर दिसत होती .तिचे केस अजूनही ओले होते,तिने नेमकीच अंघोळ केलेली असावी म्हणून ती जास्त फ्रेश दिसत होती. शामला ती आवडली होती. पण तनु ने अजूनही त्याला नीट पाहिलं नव्हतं. तिला अजून एक चॉकलेट खाऊ वाटत होतं,पण तिला खाता येत नव्हतं, तिला आज पहिल्यांदा आगंतुकासारखं वाटत होतं. ती सतत मांडीवर ठेवलेल्या बॅगला  सावरत होती.
तनु अन शाम दोघेही यावर्षी १२वी विज्ञान शाखेला होते.शाम यावर्षीच रामदास कॉलेज मध्ये आला होता. अन आज त्याचा कॉलेज चा पहिला दिवस होता. नवीन दिवसाचं टेन्शन त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं पण त्याने तनूला पाहिल्यानंतर ते काहीसं कमी झालं.तनु मात्र निवांत होती.तो जवळ बसल्यामुळे तिलाही  थोडसं टेन्शन आलं होत खरंं. ती खिडकीत पाहत होती, बस गावाकडच्या कच्च्या रस्त्याने जात असल्याने गाडी गुलाल उधळल्यागत फुफाटा करत जात होती. खेड्यातील रस्त्यावर खड्डे  पाचवीला पुजलेले असल्याने गाडी आदळत ही होती, तिच्या या पराक्रमाने तनु अन शाम मधलं मगवाच अंतर थोडं का होईना कमी झालं होतं. ते मात्र दोघांनाही समजलेलं नव्हतं.
तेवढ्यात अचानक तनूच्या डोळ्यात काहीतरी गेलं अन ती डोळा चोळू लागली. थोड्याच वेळात तिचा डोळा लाल झाला . डोळ्यातला कचरा मात्र अजून निघाला नव्हता. कचऱ्यामुळे होणारी आग तीला असह्य करत होती,तिचा डोळा ओला झाला होता. शाम शांतपणे तिच्याकडं पाहत होता. तिचा लाल झालेला डोळा त्याला पाहवत नव्हता तरिही तो काही करू शकत नव्हता. कचरा अजून निघाला नव्हता, पहिल्यांदा तिने रडावलेल्या चेहऱ्याने शामकडे पाहिलं. तीच त्या पाहण्याने त्याला कसंतरी झालं,
काय झालं, डोळ्यात कचरा गेलाय का? तो पुटपुटला.
मगवाच्याच रडावलेल्या चेहऱ्याने तिने ,हं! केलं.
ती त्याच्याकडे आशेने पाहत होती.
तो तिच्या कडे सरसावला, दोन्ही हाताने तिच्या डोक्याला पकडून त्याने तिच्या डोळ्यावर फुंकर मारली.२-३ वेळेस फुंकर मारल्यावर कचरा बाहेर आला. डोळ्याची जळजळ एकदम थांबली अन तिला हायसं वाटलं. कचरा निघाल्याने शामला ही बर वाटलं. ती कृतज्ञतनेच्या भावनेनं शाम कडे पाहू लागली, अन स्मितहास्य करून थँक्स म्हणाली.तिच्या गालावर पडणाऱ्या खळीने शाम अधिकच खुश झालं, मनातल्या मनात देवाला लाखो वेळा धन्यवाद देऊ लागला. एवढ्याश्या प्रसंगाने दोघेही आता ओळखीचे झाल्यासारखें दिसत होते. तिच्याही चेऱ्यावरच स्मितहास्य लपत नव्हतं, तीही मनोमन खुश झाली होती. थोडा वेळ असाच गेला, दोघहि पुन्हा तटस्थ झाले,एकमेकांपासून नजर लपवत  चुळबुळ करत होते. त्याच्या मनात प्रेमाच्या लाटेने केव्हाच किनारा गाठला होता तर तीच्या मनात परोपकाराची भावना अंकुरली होती. गाडी चांगल्या रस्त्याने लागल्याने शांतपणे धावत होती. बसमधला किलबिलाटही बराचसा शांत झाला होता. शाम तर जाम खुश दिसत होता, कॉलेजचा पहिलाच दिवस अन तिच्या सोबत झालेली पहिली भेट त्याला सारखी हर्षोउल्हासित करत होती. कोऱ्या वहिचे कोरे पान तो पुन्हा पुन्हा वाचत होता.
तेव्हड्यात ड्रायव्हरने मगवासारखं करकचून ब्रेक दाबलं, अन बस मध्ये एकच गोंधळ उडाला.  शामचं डोकं समोरच्या सिटच्या पाठीमागच्या दांडीवर जोरात आदळलं, अन तो वेदनेने विव्हळला. तो डोक्यावर हात चोळत होता अन ते पाहून तनु हसत होती. सुरुवातीला त्याला तिचा राग आला पण तिच्या गालावर पडणाऱ्या खळीने मात्र त्याचा राग हवेतच विरघळला, आता तोही हसत होता. दोघे एकमेकांकडे पाहून हसत होते अन त्यांची ओळखही नकळत वाढत होती.
एकदाचं अंबड बसस्टँड आलं, गोंगाटासह बस मधली गर्दी रीती झाली अन बस ने मोकळा श्वास सोडला, शाम तनूच्या नंतर उतरला. तो आशेने तिच्याकडे पाहत होता पण तिने एकदाही मागे न पाहता ती कॉलेजच्या रस्त्याने चालू लागली.
तनु माधवकाकाची दुसरी मुलगी पण आता एकुलती एक, कारण २ वर्षांपूर्वी तिच्या मोठ्या बहिणीच कसल्याशा आजाराने निधन झालं होतं.यंदा माधव काका थोड्याश्या मताने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हरले होते.४ एकरावरच्या मोसंबीच्या  बागेने बक्कळ पैसा जमवला होता. माधवकाका ला मुलगा नव्हता, त्यामुळे तनूचे लाड घरात सर्वच जण करायचे. पण तनु लाडाने बिघडणारी मुलगी नव्हती, ती संस्कारी होती. तिचा शांत स्वभाव सर्वांना आवडत असे. गेल्याच वर्षी तिला सोयगावचे पाहुणे पाहून गेले. मुलाला ती पसंत होती, पण तिला आताच लग्न करायचं नव्हतं, अण्णाला तिने सांगून ठेवलं होतं की मला अजून शिकायचं,किमान बारावी तरी पूर्ण करायची. अण्णाही तिच्या शब्दाबाहेर गेले नाहीत,१० वीला शेकडा ८० गुण मिळाल्याने अण्णानेच तीच ऍडमिशन अंबड ला केलं होतं. शिवाय ती गावातली दुसरीच मुलगी होती जी विज्ञान शाखेत अंबडला शिकत होती.यावर्षी १२ वीला असल्याने ती अंबडला रूम करून राहणार होती. पण रूम पार्टनर भेटत नसल्याने सध्या बसनेच जात होती.
१० वाजता जाधव सरचे जीवशास्त्रच लेक्चेर होतं. तनु दुसऱ्या नंबरच्या बाकावर बसत असे.जाधव सर आज मेंडेलचे नियम शिकवणार होते, लेक्चर सुरू होऊन १० मिनिटे झाली होती.
.....may I come in sir  त्याने विनंती केली.
सगळे जण दरवाजाकडे पाहत होते.
Yes, सर ने त्याला आत घेतलं.
why you are late?
Are you new student?
If new, then introduce yourself to all of us.
सगळे प्रश्न सरने एकदाच विचारले.
Yes sir.
I am new student of this college,late admitted.
My name is Sham Ramakant kadam
I am from chinchkheda. तो उत्तर देऊन शांत झाला.
Okk , then take your seat ,and give attention towards lecture.सरने आवरत घेत त्याला बसायला सांगितलं.
Now,Lets see the rules of mendel............सरने लेक्चरला सुरुवात केली.
सगळे जण त्याचं introduction ऐकून अवाक झाले होते, कारण पहिल्यांदा कोणीतरी इंग्लिशमध्ये परिचय करून दिला होता. तनु तर अजून शॉक होती ,ती सारख त्याच्याकडे पाहत होती.तिला खूप आनंद होत होता.कारण सकाळी तिच्यासोबत घडलेला तो प्रसंग तिच्या पारपटलावर फिरू लागला, का कुणास ठाऊक तिला स्वतःचाच अभिमान वाटत होता. शाम हुशार होता.त्याला इंग्लिश छान जमत होतं.
लेक्चर संपत आल होतं, सरने हजेरी घ्यायला सुरुवात केली, एकामागून एक नंबर घेत मुले हजेरी देत होते.
तनुजा शिंदे?
Yes sir, ती उठली.
आता शॉक होण्याची वेळ शामची होती. आज त्याला धक्यामागून धक्के भेटत होते. जी त्याला पाहताक्षणी आवडली होती ती मुलगी त्याच्याच वर्गात होती. तो खूप सुखावला. तास संपल्यावर सर्व मुलं बाहेर जात होती, शाम मुद्दामहुन पाठीमागे राहिला होता.ति तिच्या मैत्रिणी सोबत दरवाजातून बाहेर जात होती. मोठ्या आशेने तो तिच्याकडे पाहत होता,पण ती त्याच्याकडे न पाहताच निघून गेली.तो हिरमुसला. हातात वही घेऊन तो पण वर्गाबाहेर पडला.
(क्रमशः)
#balraje28

Wednesday 3 January 2018

कर्नाटक सुपरफास्ट एक्सप्रेस ...एक प्रवास




               

कर्नाटक सुपरफास्ट एक्सप्रेस मनमाड स्टेशनला आली,अन मनाची घालमेल ही वाढली, गाडीमध्ये बसावं की नाही,या विचारात तब्बल १० मिनिटे गेली; नवख्या खान्देशात जायचं होतं,धीर लागत नव्हता,माझ्या मनाची तर तयारीच नव्हती गाडीमध्ये  बसायच कारण माझ्या तत्वामध्ये बसत नव्हतं, तिकीट न काढता प्रवास करायचा तो! आम्ही तिकीट काढलं नव्हतं अस नाही, म्हणजे आम्ही ज्या रेल्वेचं तिकीट काढलं होत (सचखंड एक्सप्रेस)तिला अजून १ तास अवधी होता, पण अभिजतच म्हणणं होतं की आपण कर्नाटक एक्सप्रेसनच जायचं! माझा नाईलाज होता,मला ही थकवा जाणवत होता.
      जनरल डब्बा शोधता शोधता रेल्वेचं शेपुट आलं,तिथं पोहचतो न पोहचतो तोच ताणून उभा राहिलेली गाडी सैल व्हायला लागली, धावतच डब्ब्याच्या दरवाजाजवळ पोहचलो, पलीकडच्या दरवाजात एक १८-१९ च्या वयातील तरुणी TC सोबत भांडत होती, तिच्या सोबतचा तरुण मात्र गप उभा होता.मुलीचा आवाज घाबरलेला नव्हता, ती त्वेषाने TC ला बोलत होती जणू तीन काहीच केलं नाही.(तिकीट मात्र काढलं नव्हतं)मी तीच धैर्य पाहत होतो, अचानक माझ्या शर्टला पकडून अभिजितन मला डब्ब्यात कोंबल.

     माझा अजूनही एकच पाय खाली टेकलेला होता,दुसरा पाय अजून अधांतरी होता,खाली टेकण्यासाठी धडपडत होता, पायात बूट असल्याने उगीच माझे  पाय मला आज मोठे वाटत होते. किती गर्दी ती, म्हणजे मी एकटाच नव्हतो असा,त्या डब्ब्यातला प्रत्येक जण असाच उभा होता,त्यांच्या चेहऱ्यावरुन तस भासत होतं.तसा जनरल डब्बा माझ्यासाठी नवीन नव्हता,९-१० वर्ष याच डब्ब्याने प्रवास केला.पण आज श्वास घ्यायला ही जागा नव्हती.कसाबसा २०मिनिटांनी पाय खाली टेकला अन जीवात जीव आला. सर्व डब्बाच परप्रांतीय प्रवाशाने भरला होता अन आम्ही दोघचं त्यात मराठी, आपल्याच प्रांतात हरवलेल्या सारख आम्ही एकमेकाकडे पाहत होतो. त्यांच्या अंगाच्या घुर्रट वासाने दोघांचं ही डोकं दुखू लागलं,त्यांच्या तोंडातल्या माव्याने तर अख्खा डब्बा प्रदूषित झाला होता. खर तर अभिला अन मला उतरू वाटत होतं पण आता पर्याय नव्हता, गाडी आता जळगावलाच थांबणार होती. आमच्या कपड्याची तर त्यांनी पार वाट लावली होती. किळसपणा काय असतो आज कळाला.आश्चर्य तर तेव्हा वाटलं जेव्हा टॉयलेट चा दरवाजा कोणीतरी उघडला, त्यात ४ जण मस्त निवांत बसले होते😊.गाडी ८०-१०० km/hr ने धावत होती, पण आम्हाला वाटत होतं तीन आज अजून जोरात पळावं.
न राहून  मी समोरच्या समवयस्क तरुणाला विचारलं ,भाई तुम सारे एक साथ हो क्या? कहा,जा रहे हो? क्या करते हो? मगवापासून तुंबलेले प्रश्न एकामागून एक विचारले.समोरचा तो तरुण दरवाजातून बाहेर तोंड कडून मनसोक्त थुंकला, अन मोकळा झाल्यावर माझ्याकडे बघू लागला."हा भाई हम कर्नाटक से है और हम लखनौ जा रहे है।वहा फॅक्टरी मे काम करते है। काम के वास्ते हम हरसाल जाते है।अजून बरच काही बोलला.
'गरिबी' व 'पैसे'ची हतबलता होती त्या गर्दीचं कारण! त्यासाठी किती सौदे केले होते त्यांनी,त्यांच्या घरासोबत ,शिक्षणासोबत, आवडी-निवडीसोबत. अंगावर साचलेल्या मळाच्या थराने अन त्यांच्या त्या निस्तेज चेहऱ्याने त्यांची ढोर-मेहनत लपत नव्हती. १८-२० वयाच्या त्या केविलवाण्या चेहऱ्याकडे पाहून मी खुप श्रीमंत असल्यासारखं वाटायला लागलं.(मुळात तस नाही) मी सगळ्या डब्यात नजर फिरवली, मला आता किळस नव्हती येत, करूनतेचा पान्हा हृदयात फुटत होता.कोवळ्यापनीच कठोर झालेली त्यांची मनं वाचता येऊ लागली.
         रेल्वेच्या भोंग्याने तंद्री भंग पावली, कोणतं तरी स्टेशन आलं होतं, थोडा मोकळा श्वास घ्यावा म्हणून दरवाजातून बाहेर तोंड काढलं, एक थंडगार हवेची झुळूक गालाला चिकटून गेली, खूप बरं वाटलं, पण खिडकीतून कोणीतरी पचकन थुंकलं होतं, खूप ओशळयागत झालं.तोंड साफ करून बाहेर पाहत होतो, खानदेश सुरू झाला होता, छोटे मोठे डोंगर  सांजच्या भग्न  वाऱ्याने ताठरलेले वाटत होते. वातावरण ही थोडं रंगेल झालं होतं.
   ढोलकीच्या तालावर एक छोटी मुलगी हिंदीतल्या  चित्रपटातलं गाणं म्हणत पैसे मागत होती, गाणारी ६-७ वर्षाची छोटी मुलगी १७-१८ वयाच्या मुलीच्या ढोलकीच्या तालावर गात होती. गर्दीमुळे मी फक्त आवाज ऐकू शकत होतो.ते जोडपं गर्दीतून वाट काढत येत होतं. माझ्या बर्थजवळ जवळपास २०-२५ तरुण दाटीवाटीने ताटकळत बसले होते,काही उभे होते, त्या आवाजानं थोडं का होईना हायसं वाटलं.
गुलाबी फ्रॉक घातलेली छोटी मुलगी गाणं म्हणत होती, (आवाज तेवाढाही  बेसूर नव्हता!) सगळ्यांच्या नजरा मात्र त्या तरण्या मुलीकडे होत्या, गोरा वर्ण, नाकाची अचूक ठेवण, शेंदऱ्या गंधाने ती अधिकच खुलून दिसत होती.नेमकाच वयात आलेला तिचा ऊर तिला सौंदर्य प्रदान करत होता. ती मधेच बारकीच्या सुरात सूर मिसळून गायची. तिला पाहून वाटत नव्हतं ती गरीब असेल कारण ती सौंदर्याने खरोखरचं श्रीमंत होती.त्यामुळेच सगळे जण तिला पैसे देत होते अन तेही १०-१० रुपये!(मी नाही दिले,ज्याला हातपाय, डोळे आहेत त्यांना मी कधीच पैसे देत नाही).अगदी अभिजितने ही बारकीला ५ रुपये दिले. त्या गात होत्या अन ते तरुण त्यांना पैसे देत होते.
समोर जायला रस्ता नसल्याने ती जोड तिथेच त्या तरुणांमध्ये बसली, आश्चर्य त्यांना एवढ्या गर्दित ही जागा  मिळाली! त्या आता शांत झाल्या,थकल्या असाव्या! ५-१० मिनटं अशीच गेली ,सर्व शांत होतं, नेमकेच वयात आलेले तरुण तिला न्याहाळत होते,गुपचूप! मी त्या तरुणांना बघत होतो, मला वाटत होतं तिने आता जावं!पण ती तिथेच बसलेली होती. आता चुळबुळ वाढली होती, वर एकदोघ झोपलेले होते,त्यांनाही बाजु वाल्याने उठवलं. सगळ्यांची नजर आता शिकार्यासारखं सावजावर पडत होतीं, कारण सावज आता स्थिर झालं होत,पहुडलं होतं.
त्यातला एक शिकारी सावजाला फूस लावत होता,"२० रुपये देतो उभा राहून गाणं म्हण."त्या कारणाने त्याला सावजाला पूर्ण न्याहाळाचं होतं. ती थकली होती ,ती फक्त हसली,बहुतेक तिने ओळखलं असावं.पण त्या २० रुपयाच्या नोटेकडे पाहून बारकीच मन आशेनं पाझरलं, ती लगेच उभा राहिली, तिला तिनं ढोलकी वाजायला खुनवलं, ती फक्त  बारकिकडे पाहत राहिली, अन हसली.अन गप झाली, मला कळत नव्हतं, तिच्या मनात काय चालू आहे.तिचा नजरेने मात्र शिकाऱ्याला ओळखलं होतं. तरी ती शांत होती, मला अप्रूप वाटलं! हसल्यावरही ती गोड दिसायची, त्यामुळे दुसऱ्या  शिकाऱ्यालाही चेव यायला,मगवाची शांतता आता भंग पावली,वातावरणातला रंगेलपणा कधी डब्ब्यात आला काही कळलंच नाही. कोणी आता२० रुपये ,३०रुपये हवेत फिरवत होत, जस काय डब्ब्यात तमाशा रंगात आलाय..
तरीही ती शांत होती, हसत होती, सगळीकडे नजर फिरवत होती, जस काय तिची अन या शिकाऱ्याची खुप जुनी ओळख असावी, मला तीच कौतुक वाटायल अन भीतीही! शिकारि खुप होते अन तेही एकाच जातीचे,एकाच रहवासातले, अन ती एकटी, तुटून पडले तर काय होईल, माझी धडधड वाढत होती.
तिच्या जवळ बसलेल्या तरुणांची उगाच चुळबूळ वाढली होती, तिच्या अंगाला निमीत्त करून ती जाणवत होती, त्या घोळक्यातला माणूस नावाचा प्राणी केव्हाच संपला होता, वासनेचा राक्षस जागा होत होता, अश्लील बोलणं,अन हसणं वाढत होत, मला तिचा आता राग येत होता, ती गरीब जरी असली तरी, ती एक स्त्री होती, माजावर आलेली मादी नव्हे!मनातून मी प्रार्थना करत होतो, की हिने आता इथून जावं, कारण गाडी फक्त जळगावलाच थांबणार होती. ती नाहीच उठली.
अभिजित दरवाज्यात पायऱ्यांवर बसला होता , त्याला उठवलं तर त्याची जागा जाईल, केव्हाचा ताटकळत उभा होता ,आता कुठ बसला होता तो !,त्याला उठवणं मला बर वाटल नाही. मग मीच  बोलता झालो,
ये गलत है।
अकेली लडकी देखके उसका मजाक करना अच्छी बात नहीं है।
उसके जगह अपनी बेहन होती तो क्या हम ऐसें करते?


माझा हा त्रागा खास तर यासाठी होता की ,माझ्यासोबत कोण कोण आहे, का सगळे त्या शिकाऱ्यासोबत आहे म्हणून, जर काही झालं तर कोणी मदतीला येईल का ?
माझ्या या बोलण्याने २-३ जण सकारात्मक  वाटत होते, मला याचा खुप आनंद झाला.
डब्ब्यामध्ये बसताना भांडणारी अन ही शांत तरुणी विरोधाभासी वाटली, आता मात्र त्या  तरुणाबद्दल वाटणारी करुणाही आटली. कदाचित तिची अगतिकता अन हे असले स्पर्श तिच्या नात्यातले असावे, की ज्यांचा सहवास रोजचा असावा, अन झालाही स्पर्श तर तो आपल्याच व्यक्तीचा आहे,एवढी समजदारी तिच्यात असावी.
एकदाची ती उठली अन त्या डब्यातून परत निघाली, तरीही जाताना एका शिकाऱ्याने तिचा कमरेला पकडलंच...पण ती अलगद या चक्रव्यूहाततुन अगदी वेळेवर बाहेर पडली,अन माझा मनाची घालमेल एकदाची संपली.

गरिबी, पैसा याचा अन वासनेचा काही एक संबंध नसतो, मला कोडं सुटल्यागत झालं.
अगतिकता ,लाचारी,मनु्ष्याला कमजोर बनवते, तिला जर योग्य वेळी ओळखता आलं ना..तुम्ही कोणत्याही चक्रव्यूहातुन अगदी सहज बाहेर पडू शकता...
मगवा पासून दाटलेला श्वास  जळगाव आलं नि मोकळा झाला, मुळात परीक्षेची उत्सुकता नव्हतीच खरी! एका नवख्या प्रदेशाला अनुभवायचं होतं. त्याहीपेक्षा जळगावच गरमागरम वांग्याचं भरीत ओढ लावत होतं......

Tuesday 26 December 2017

काठीचा आधार



       
वेळेचा अंदाज घेऊन मी अन आकाश एकदाच दवाखान्यात पोहचलो. अगदी ७-८ लोक मावतील एवढा तो मोठा  दवाखाना.पण तिथे असलेली नेहमीची गर्दी राहुरीतल्या मोठया हॉस्पिटललाही लाजवेल एवढी नक्कीच होती.आम्हाला पटकन आवरून दशक्रिया चित्रपट पाहायला जायचं होतं.आमचा नंबर ४-५ पेशंट नंतर येणार होता.त्यामुळे मी तर निवांत होतो, बाकी आकाश मोबाईल मध्ये मग्न होता.
नेहमी प्रमाणे माझी नजर दवाखान्यात इकडे तिकडे फिरू लागली. भिंतीवर लटकावलेले देवाचे फोटो पाहून मी एका क्षणासाठी विचार करू लागलो ...नक्की मी दवाखान्यातच आलो ना!
हो नक्की दवाखान्यातच आलो होतो मी,एका केबिन मध्ये एक वयस्कर, थोडा ढेरी सुटलेला अनुभवी व्यक्ती इंजेकशन भरत होता.टेबलावर औषध्याच्या बाटल्या अन इंजेक्शन पडलेली होती.
मी दरवाज्याजवळ एका बाकड्यावर बसलो होतो, माझी नजर सहज पुढे गेली, एक जोडपं बसलेलं होत.......
वय जेमतेम असेल ७५-७८ च्या आसपास,एक म्हातारी बाकड्यावर झोपलेली होती,पूर्ण शरीराचा मुटकूळा करावा तशी ती झोपलेली होती .अंगावर एकदम मळकट साडी, एखाद्या लाकडाला साडी नेसवावी अशीच होती.
पायाला जखमा झालेल्या होत्या,माश्या त्यावर घोंगावत होत्या,१-२ वेळेस तिने त्यांना रोखण्याचाही प्रयत्न केला पण तिचा हात तिला उचलत नव्हता, कदाचित तिनेे जेवण केलं नसावं.
तिच्या डोळ्यात अश्रू नाही दिसले (कदाचित संपले असतील )परंतु करूण भाव मात्र नक्की होते.डोळ्याची बुबळे पांढरेफटक पडले होते.मध्येच ती उठायचा प्रयत्न करत होती परंतु,नव्हतं जमत तिला....
बाजूलाच  म्हाताऱ्याचा थरथरना हात म्हातारीला सावरत होता, म्हातारीला 'अजुन' ही आधार देत होता.म्हातारा ही तसाच काठीला लटकलेला होता. त्याची अंगाची काळी चामडी पार हाडाला चिकटलेली होती ,सुरकतलेल्या कातड्यावरून 'नसा' स्पष्टपणे दिसत होत्या. तर डोळे निर्विकारपणे नंबर येणाचा वाट पाहत होते,त्याच्या हातातली काठी काहीतरी सांगत होती,का कुणास ठाऊक ? तो तिला जमिनीवर राहून राहून आपटायचा,जणू काही अजून ही त्याने परिस्थितीशी हार मानलेली नसावी असंच काहीतरी! म्हाताऱ्याच्या आवाजात मला धीटपना दिसला कारण त्याचा आवाज नक्कीच त्याच्या वयाला शोभत नव्हता, किती तरुण आवाज होता तो! त्याच मर्दानीने तो म्हातारीला खेकसत होता, अन आधार ही देत होता.
माझी नजर आता आजूबाजूला शोधक नजरेने फिरत होती , कोणीतरी असेल यांच्यासोबत...
पण मी हताश झालो,नव्हतंच कोणी सोबत..
तेवढ्यात त्यांचा नंबर आला...म्हाताऱ्याने तिला उठवलं, थरथरनारे दोन्ही जीव कसेबसे डॉक्टरच्या केबिन मध्ये गेले.
माझा श्वास आता गरम झाला होता,कानशील तापत होती, डोक्यामध्ये मध्ये रक्त वेगाने पळत होत,आयुष्यभर ज्यासाठी धावलो ,पडलो ,झडलो ते अजूनही नव्हतं मिळालं, डॉक्टरच्या इंजेक्शनने ते काय मिळेल!नाहीतरी या शरीराचं झालेलं गाठोडं उगाच बाकड्यावर नसतं झोपलं.
मला उगाच अस वाटत होतं.त्या जोडप्याच्या मळकट चेहऱ्याकडे पाहून मला माझा ही चेहरा आता मळकट वाटू लागला, माझ्या समोर माझं मन 'न'मानणारं सत्य 'आ वासून' उभा होत.जीवनाच्या व्याख्यातील सुरवातीच्या ओळीचा अन शेवटच्या ओळीचा हा विरोधाभास माझ्या हृदयाची धडधड वाढवायला पुरेसा होता.
 'सुख' अगदी 'आकाश'च्या भाषेत सांगायचं झालं तर 'आनंद'हीच तीच गोष्ट! तिच्या साठीच असतो न हा खटाटोप,पण ती नेहमीच चकवा देते आपल्याला, मृगजळा सारखा! आज जीवनाचे शेवटचे क्षण मोजतानाही तो 'आनंद' ते 'सुख' भेटलेलं नव्हतं. मला लगेच म्हाताऱ्या च्या तरूण पणाच चित्र दिसत होतं ,किती उत्साह असेल न ऐन उमेदीत जगण्याचा, त्या मृगजळाच्या पाठीमागे धावण्याचा.
आपण ही तेच करतो नुसतं पळत राहतो, कधीच थांबत नाही, अगदी थकल्यावरही नाही थांबत कारन न संपणाऱ्या 'अपेक्षा ' नाही न थांबू देत.
माझं मन अजून एका गोष्टीने दुखावलं गेलं,आपली आपली म्हणणारी माणसं कधी परकी होतात,हाताखांद्यावर खेळवलेली मुले कधी मोठे होतात ते कळत पण नाही,
ज्यांच्यासाठी सगळं आयुष्य पणाला लावलं, अगदी स्वतःच्या सुखासोबत सुद्धा सौदे केले, नेहमी त्यांच्या साठी 'हार'  मानून स्वतःच दुःख कडवटपणे गिळलं ,त्यांना म्हातारपणी काठीचा आधार व्हायला पण लाज वाटते, किती शोकांतिका ना! मला म्हाताऱ्याच्या हातातल्या 'निर्जीव' काठीचे खूप आभार मानवासे वाटले, जिला सुख, दुःख,भावना, यातना यातलं काहीच समजत नाही ,तिने अजूनही साथ सोडली नव्हती. अन ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवाव्या, ती रक्तामांसाची  'आपली' माणसं निघालीत प्रवासाला,सांगायला वाईट वाटतं,तो प्रवास ही इथेच एका बाकड्यावर थरथरत संपणार आहे, कदाचित  प्रवासात निघालेल्या माणसांना  हे माहीत नसावं ! म्हणजे आपण सर्व प्रवासाला निघालोय पण आपल्याला माहितच नाही कुठे जायचं ते?
तेवढयात म्हाताऱ्याने आजीला पकडून दरवाजातून बाहेर आणलं, म्हातारीमध्ये कसलच त्राण नव्हतं,तिला फक्त थरथरनाऱ्या हाताचा आधार होता, म्हातारा तिला सावरू शकला नाही अन पुढच्याच क्षणाला म्हातारी धपकन खाली पडली, म्हातारा बावरला ,तरीही त्याने तिचा 'हात' सोडला नाही,तो तिला उठवू शकत नव्हता, माझं मन विषण्ण झालं, नकळत माझे हात पुढे सरसावले,आजीच्या दंडाला (नव्हे हाडाला) पकडून उभा केलं, तिचा तो स्पर्श मला माझ्या भविष्याचा अनुभव देऊन गेला. मी तिला खाली बसवलं. मी माझ्या जागेवर येऊन बसलो ,आता माझाही हात थरथरत होता..... माझ्यासाठी हा अनुभव खूप भयंकर होता.मी या प्रवासात 'अचानक' दिशाहीन झालो होतो.
आकाशचा नंबर आला तो चेकिंग साठी आत गेला व आलाही, मी मात्र तसाच स्तब्ध होतो......
तेवढ्यात गणेशचा व भोसले सरांचा कॉल आला.... कुठे आहात पटकन या मूवी सुरू होईल.. घडयाळीत बरोबर 3 वाजले होते.....
आम्ही दवाखान्यातून बाहेर पडलो, शीतल टॉकीजकडच्या रोडला लागलो, मनात आलं हाही एक प्रवास आहे ,पण आता मी खुप 'स्पष्ट' झालो होतो, 
आम्हाला दशक्रिया पाहायला जायचं होतं......
......माझ्या मनाची 'दशक्रिया' मात्र केव्हाच झाली होती.....
                  -गाढवे बाळासाहेब (ढाकेफळ,जालना)